Saturday, 5 June 2021

गीताश्लोकाचा अर्थ

 कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।

मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥ (2.47)


हा श्रीमद्भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायातील (सांख्ययोग) 47 वा श्लोक. अतिशय प्रसिद्ध असा हा श्लोक आपल्याला कर्ममार्गाद्वारे मोक्षमार्गाकडे कसे सरकत जावे व त्यासाठी काय करावे, काय करू नये, काय त्यजावे आणि काय अंगिकारावे हे व असे विचार करण्यास उद्युक्त करतो. 


ह्या श्लोकाचा बऱ्याचवेळा ढोबळ मानाने अर्थ काढला जातो व त्यानुसारच आपण सर्वसामान्य लोक नेहमी बोलताना बोलतो की नुसती कर्मे करणे हेच माझ्या नशिबी आहे. कशाकडून काही फळ मिळेल ही अपेक्षा मात्र मी ठेवायची नाही. नुसते काम करा आणि सोडून द्या. आम्ही कामे मात्र करायची, पण त्याबदली आम्हाला काही मिळेल ही साधी अपेक्षा सुद्धा ठेवू नये का? बरोबर ना. थोड्याफार फरकाने असेच विचार येतात ना आपल्या मनात? 


पण हे असे मुळीच नाहीये. 


असे जर असेल तर मग नक्की अर्थ काय याचा? 

भगवान श्रीकृष्णांना नक्की काय सांगायचे असेल इथे? तो अभिप्रेत अर्थ आपण आता बघू. पण या आधी एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी व ती ही की श्रीकृष्णाने आपल्याला प्रत्येक वेळी कर्माचे महत्व सांगितले आहे. आपण सदा सर्वकाळ कर्मरत असावे हेच त्यांचे म्हणणे आहे. अकर्मी बनू नकोस (कर्म न करता उदासीन बसून राहू नकोस), नपुंसक (क्लैब्य) बनून राहू नकोस हे श्रीकृष्ण वारंवार सांगतात. 

याचाच अर्थ कर्म करणे हे अटळ आहे, क्रमप्राप्त आहे.


या श्लोकाप्रमाणे, कर्म करणे अथवा न करणे, केले तर नक्की काय, कसे आणि कधी करायचे हे सर्व आपल्या हातात आहे. इथे श्लोकातील 'अधिकार' या शब्दाचा अर्थ हक्क अथवा 'जन्मसिद्ध अधिकार', total authority या सारखा होत नाही. तर आपल्या क्षमतेला, भगवंताने, कर्म करणे इतपतच मर्यादित ठेवले आहे, फक्त कर्म करणे या हद्दीपर्यंतच आपण जाऊ शकतो, तिथेच आपली हद्दक्षमता संपते अश्या अर्थाने घ्यायचा आहे. थोडक्यात काय तर आपण स्वतःच्या ताकतीला, क्षमतेला अमर्याद समजू नये. कर्म करणे इतपतच आपली जी सीमा आहे तिचे रक्षण करणे अर्थात योग्य कर्म करणे हेच आपल्या कक्षेत आहे.


मग असे जर असेल तर पुढे काय? मी कर्म केले तर मी माझ्याच लावलेल्या झाडाचे फळ मिळावे ही अपेक्षाच करायची नाही का? तर ते असे नाहीये.


श्रीकृष्ण म्हणतात, की एकदा तू कर्म केलेस (तुला कर्म निवडण्याची संधी दिली होती) की मग मात्र तुला त्याचे फळ निवडण्याची संधी मिळणार नाही. म्हणजे, केलेल्या कर्माचे हे असेच फळ मिळाले पाहिजे, आत्ताच मिळाले पाहिजे, अथवा फळच मिळू नये(वाईट काही केले असेल तर) असे निवडण्याची आपल्याला सोय व संधी नाही. कारण ज्या वेळी तू कोणते कर्म करायचे हे निवडतोस व त्याप्रमाणे वागतोस त्याच वेळी त्याचे फळ तू न निवडताच तुझ्या पदरात पडलेले असते. कारण कोणत्या परिस्थितीत कोणते कर्म कसे केले गेले व त्या प्रमाणे त्याचे फळ काय असेल, कोणत्या स्वरूपात असेल, ते कधी मिळेल, कसे मिळेल हे नियम आधीच तयार झाले आहेत व ते नियम पूर्णपणे त्या अंतरात्म्याच्या आधीन आहेत. म्हणून फळ हे त्याच नियमानुसार मिळेल. आपल्या इच्छेप्रमाणे नाही. ते फळ आपल्याला कधीनाकधी मिळणारच आहे. आपली त्यावेळी फळ भोगायची इच्छा, अपेक्षा आणि शक्ती असो वा नसो.

काही फळे लगेच मिळतात तर काही उशिरा तर काही अनेक जन्मानंतर. पण कर्म केले की फळ मिळाल्याशिवाय रहात नाही.


आपण केलेल्या प्रत्येक कर्माचे फळ जमा होत असते त्याला संचित (साठलेले, जमा झालेले) म्हणतात. भगवद्नियमाप्रमाणे, फळ परिपक्व झाले की आपल्याला मिळते. ते केलेल्या कर्माचे मिळालेले फळ (जे कोणत्याही जन्मातील असू शकते) आपण वर्तमानात भोगत असतो त्याला प्रारब्ध (नशीब) म्हणतात. ते फळ भोगण्याबरोबरच आपण नवीन कर्मे करत असतो ज्याला क्रियमाण कर्म (वर्तमानात केलेली कर्म) म्हणतात. तर अश्या क्रियमाण व संचितातून आपण आपल्याकडे येणारी प्रारब्ध फळे भोगत असतो ज्याच्यावर आपला काहीही ताबा नसतो. व म्हणूनच कर्मफळावर तुझा अधिकार/ताबा नाही असे म्हणले आहे. 


आपण केलेली प्रत्येक कर्मे आपल्याला योग्य बरोबर आणि चांगलीच वाटतात. पण भगवद्नियमाप्रमाणे ती योग्य आहेत का नाहीत हे आपल्या लक्षात येत नाही आणि शेवटी आपण कर्म व त्याचे फळ यात अडकून बसतो. एकदा या चक्रात अडकलो की मग अशी साठलेली फळे भोगायला पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रात अडकावेच लागते. इथे आपल्याला कोणत्याही योनीतील जन्माच्या निवडीचा अधिकार नसतो.


मग यातून सुटावे कसे? तर यावर भगवान साधा सोपा मार्ग सांगतात. ते म्हणतात की अखंड माझ्या नामस्मरणात रहा. कर्म करणे सुरू ठेव आणि जे काही करशील ते त्याच्या फलापेक्षेसहित माझ्या चरणी अर्पण कर. हळूहळू तुझी मी केले मी केले ही भावना लयाला जाईल. अश्या अवस्थेत हातून फक्त उत्तमच कर्मे घडतील आणि कर्म व कर्मफळ माझ्या चरणी अर्पण केले असल्याने तू या फेऱ्यातून हळूहळू बाहेर पडशील. मुक्त होशील. अर्थात हे कष्टसाध्य आहे व साधना, नामधारणा केल्याने हे नक्कीच साध्य होऊ शकते.


Sachin Bhide

No comments:

Post a Comment