Saturday, 5 June 2021

आळंदीचा माझा राजा

 आपेगांव स्तब्ध झाले, गहिवरले नेवासे ।

आळंदीचा माझा राजा, समाधी ही घेत असे ।।


दाटले हे नयनी पाणी, ज्ञानियासी सांगा कोणी ।

नका जाऊनि सोडूनि, इंद्रायणी विनवीतसे ।।


दिनवाणे झाले जन, निवेदिती कर जोडून ।

थांबवा तयालागुन, मुक्ताईशी सांगतसे ।।


सोपानाशी मुक्ताबाई, बोलीतसे ती लवलाही ।

निवृत्तीगुरुंच्या ठायी, करुणा ही भाकितसे ।।


नका जाऊ ज्ञानदेवा, तुम्हीच आम्हा विसावा ।

आर्त विनंती ही भावा, व्याकुळ ती झालीसे ।।


बोले ज्ञानियाचा राणा, ज्ञानेश्वरी मीच जाणा ।

अंतरंगी पाऊलखुणा, एकतत्व पूजितसे ।।


वदे ऐसे ज्ञानदेव, प्रार्थीतसे सकलही जीव ।

वंदितसे मनोभाव, निरोप तो घेत असे ।।


आली ती समाधी वेळा, होत असे हलकल्लोळा ।

ज्ञानियास बसवुनी स्थानी, गुरू शिळा लावितसे ।।


हाय हाय माझा ज्ञाना, पुन्हा नाही दिसणे नयना ।

अश्रूधार ती थांबेना, जीव त्यात अडकतसे ।।


ज्ञानियाची आत्मज्योति, सदा देतसे ही प्रचिती ।

मोक्ष मार्गिचा सांगाती, ज्ञानेश्वर होत असे ।।


अशी ज्ञानोबा माऊली, साऱ्या जगाची साऊली ।

आहे नित्य ती राऊळी, पांडुरंग रुक्मिणीच्या ।।


जावे शरण हो त्यासी, कर ठेवी जो कटीसी ।

उद्धरावे 'चरणरजा'शी, करुणा ही भाकितसे ।।


                                                               सचिन

No comments:

Post a Comment