आपेगांव स्तब्ध झाले, गहिवरले नेवासे ।
आळंदीचा माझा राजा, समाधी ही घेत असे ।।
दाटले हे नयनी पाणी, ज्ञानियासी सांगा कोणी ।
नका जाऊनि सोडूनि, इंद्रायणी विनवीतसे ।।
दिनवाणे झाले जन, निवेदिती कर जोडून ।
थांबवा तयालागुन, मुक्ताईशी सांगतसे ।।
सोपानाशी मुक्ताबाई, बोलीतसे ती लवलाही ।
निवृत्तीगुरुंच्या ठायी, करुणा ही भाकितसे ।।
नका जाऊ ज्ञानदेवा, तुम्हीच आम्हा विसावा ।
आर्त विनंती ही भावा, व्याकुळ ती झालीसे ।।
बोले ज्ञानियाचा राणा, ज्ञानेश्वरी मीच जाणा ।
अंतरंगी पाऊलखुणा, एकतत्व पूजितसे ।।
वदे ऐसे ज्ञानदेव, प्रार्थीतसे सकलही जीव ।
वंदितसे मनोभाव, निरोप तो घेत असे ।।
आली ती समाधी वेळा, होत असे हलकल्लोळा ।
ज्ञानियास बसवुनी स्थानी, गुरू शिळा लावितसे ।।
हाय हाय माझा ज्ञाना, पुन्हा नाही दिसणे नयना ।
अश्रूधार ती थांबेना, जीव त्यात अडकतसे ।।
ज्ञानियाची आत्मज्योति, सदा देतसे ही प्रचिती ।
मोक्ष मार्गिचा सांगाती, ज्ञानेश्वर होत असे ।।
अशी ज्ञानोबा माऊली, साऱ्या जगाची साऊली ।
आहे नित्य ती राऊळी, पांडुरंग रुक्मिणीच्या ।।
जावे शरण हो त्यासी, कर ठेवी जो कटीसी ।
उद्धरावे 'चरणरजा'शी, करुणा ही भाकितसे ।।
सचिन
No comments:
Post a Comment