या रचनेत पहिली ओळ श्रीसंत वाङ्मयातून घेतली आहे.
बाकी सर्व श्रीदत्तकृपेने माझ्याकडून लिहून घेतले आहे.
रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग,
कर्म करा चांग परमात्म्याचे ।।
काम आणि क्रोध, करिती विरोध,
लाविती निरोध, नामस्मरणी ।।
मदे मत्सरे या, भरले हे मन
करताती दीन, सर्वकाळी ।।
मोह आणि लोभ, जागविती क्षोभ
शून्य तो हिशोब, कर्तृत्वाचा ।।
दंभे अभिमाने, फुगतो गर्वाने
चाले ताठ माने, जगतापुढे ।।
संशये ही चिंता, वाढ वाढे आता
उणे नाही आता, विषयांचे ।।
विषयांचा घाला, मनावरी झाला
युद्ध हाचि उरला, मार्ग एक ।।
अकारण करुणा, सद्गुरू भेटले
नाम शस्त्र झाले, युध्दामाजी ।।
धरूनिया हाती, आयुष्याची दोरी
सद्गुरू सावरी, अंतरंग ।।
सद्गुरुची झाला, जीवनाची ढाल
विषयांचि चाल, लोटताहे ।।
नाम तलवार, कापीती समूळ
विषयांचे कूळ, नष्ट होई ।।
मन निर्विकार, करुनिया चार
पुरुषार्थ थोर, देवे दिधले ।।
चारी मुक्ती कर, जोडुनिया येती
सद्गुरुंची आरती, गाती बाळी ।।
ऐसे ईश कृपे, मज रिते केले
ईश प्रेमे भरिले, अंतरंग ।।
अंतरंगी व्याप्त, परमनिधान
देही कर्म जाण, देवाचेच ।।
माझे मी सरले, त्याचेची उरले
अर्पण हे केले, धन मन तन ।।
तो बोले ते करावे, तो सांगे ते ऐकावे
तो दावी ते पाहावे, हेचि कर्म ।।
देह ईश काजी, झिजो हीच आस
दत्तचरणरजास, घेई जवळी ।।
*****श्रीदत्तचरणरज*****
No comments:
Post a Comment