Tuesday, 21 September 2021

श्रीदत्त तुम्ही

 श्रीदत्त तुम्ही, त्रिगुणी मूर्ती

अनसूयाउदरी, अवतरती

ब्रम्हा हर आणि, विष्णू रुपा

हे गुरुदेवा, हे अवधूता ।। 


हे स्मितवदना, सुंदरनयना

हे मृदुलकरा, पावनचरणा

शांती स्वरूपा, अद्भुतचरिता

सात्विकरूपा, श्री गुरुदत्ता ।। 


हे दंड कमंडल, कमल धरा

हे अत्रिनंदना, विघ्नहरा

हे अभयकरा, भवतापहरा

हे दत्त दिगंबर, तिमीरहरा ।। 


अवतार तुझा, पतितोद्धारा

स्मरताच मनी, दिसतोची खरा

षड् रिपु रुपीच्या, आक्रमणा

थोपविसी तू, भयमुक्तकरा ।। 


वेदांग तुझ्या, अवतीभवती

ही नम्र धरा, कपिला पुढती

सद्रक्षण हाती, त्रिशूल सदा

हे शंखचक्रधर, नीतवरदा ।। 


तव नाम मुखी, वसुदे सखया

तव रूप नयनी, दिसुदे प्रणया

हृदयी तव मूर्ति, स्थापित ही

श्वासोच्छ्वासी, तव कीर्तनही ।। 


हा प्राण तुझा, हा शब्द तुझा

हा देह तुझा, आनंद तुझा

हा भाव मनीचा, अर्पियला 

श्रीदत्तचरणरज, उद्धरिला ।।


*****श्रीदत्तचरणरज*****

Sunday, 5 September 2021

डॉ राधाकृष्णन जीवनी

 जाणून घेऊ ... डॉ राधाकृष्णन जीवनी (शिक्षक दिन) 


डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म  5 सप्टेंबर 1888 रोजी तत्कालीन मद्रास प्रांतात चित्तूर जिल्ह्यात तिरुत्तनी गावात झाला. हिंदूधर्मसंस्कारात वाढलेल्या राधाकृष्णन यांचा वेद, उपनिषद, पुराणे, धर्मतत्व याचा प्रचंड अभ्यास होता. त्यांच्या अनेक लेखातून त्यांनी आपली धर्मविषयी मते समाजापुढे ठेवली. संस्कृत, हिंदी, तेलगू, तामिळ, इंग्लिश आदी अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. स्वामी विवेकानंद यांना ते आदर्श मानत. 

ख्रिश्चन मिशनरी शाळा व कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांना हे जाणवले की यातून हिंदू धर्माची अवहेलना होत आहे व आपल्या संस्कृतीला दूषणे देऊन धर्मप्रसाराला जोर दिला जात आहे. याला त्यांनी कडाडून विरोध केला. स्वतःचा धार्मिक अभ्यास वाढवून तर्कातून त्यांनी मिशनरीना सडेतोड उत्तरे दिली. त्यांनी धर्मवेदांत फिलॉसॉफी विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले व देशविदेशातील अनेक नामांकित जर्नलमध्ये आपले थेसिस लिहिले. वयाच्या 21व्या वर्षी सन 1909 ला त्यांनी कॉलेजमध्ये शिकवण्यास सुरुवात केली. 1962 पर्यंत ते देशातील व परदेशातील अनेक नामांकित कॉलेजात प्राध्यापक, विश्वविद्यालयात कुलगुरू व ऑक्सफर्ड विद्यापीठासारख्या जागतिक दर्जाच्या विद्यापीठात  प्राध्यापक (असे मानाचे पद मिळवणारे पाहिले भारतीय) म्हणून कार्यरत होते. अख्या जगास त्यांनी आपल्या बुद्धीवर्चस्वाने मंत्रमुग्ध करून ठेवले होते. जागतिक दर्जाच्या शेकडो विद्यापीठातून त्यांना लेक्चरसाठी व विविध पदे भूषावण्यासाठी बोलावणे येई. जवळपास 100 पेक्षा जास्त जागतिक विद्यापीठांकडून त्यांना सन्माननीय उच्च पदवी व मेरिट बहाल करण्यात आल्या होत्या. हे एकमेव असे व्यक्तिमत्व होते ज्यांचा जगाने इतका सन्मान केला असेल. 

ब्रिटिशांनी शिक्षणक्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी त्यांना सर या पदवीने भूषित केले होते, जी त्यांनी स्वातंत्र्यानंतर वापरणे सोडून दिले व डॉ. ही आपली शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदानामुळे मिळवलेली पदवी लावणे योग्य मानले. 

त्याचवेळी राजकीय क्षेत्रात न येता सुद्धा त्यांचे तिथे बुद्धीवर्चस्व होते व म्हणूनच 14 ऑगस्ट 1947 रोजी रात्री स्वातंत्र्यदिनाला त्यांनी देशाला संबोधित करावे ही तात्कालीन संविधान सभेची इच्छा होती. त्यांनी तसे केले व अत्यंत उत्कृष्टपणे देशास संबोधित केले. 

13 मे 1952 रोजी त्यांची देशाचे उपराष्ट्रपती म्हणून नियुक्ती झाली. ते या पदावर 14 मे 1957 पर्यंत होते. 

देशाचे प्रथम राष्ट्रपती डॉ राजेंद्रप्रसाद यांनी त्यांना 1954 रोजी भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित केले.

 यानंतर 13 मे 1962 रोजी ते भारताचे दुसरे राष्ट्रपती नियुक्त केले गेले. या पदावर ते 13 मे 1967 पर्यंत राहिले. 

हे सर्व कार्य करीत असताना त्यांनी ज्ञानदान अखंड सुरूच ठेवले होते व त्यांच्यातील हाडाचा शिक्षक त्यांना कधीच गप्प बसू देत नव्हता. आयुष्याची अंदाजे 40+ वर्षे त्यांनी अविरत ज्ञानदान केले. 

राष्ट्रपती असताना, त्यांचे काही विद्यार्थी व मित्र 5 सप्टेंबर 1962 रोजी त्यांना भेटायला व त्यांचा वाढदिवस साजरा करायला त्यांच्या कार्यालयात गेले असता डॉ राधाकृष्णन यांनी अश्या प्रकारे मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा करायला साफ नकार दिला. तेंव्हा ते म्हणाले की तुम्हाला आजच्या दिवशी काही करायचेच असेल तर ते देशातील शिक्षकांसाठी करा. त्यांच्या या इच्छेखातर देशात त्यावर्षीपासून त्यांचा जन्मदिवस हा शिक्षकदिन म्हणून साजरा होऊ लागला. 

Thursday, 2 September 2021

देते व्हा...

 देते व्हा... 


जन्मताच प्रत्येक मनुष्यप्राणी प्रकृतीच्या अधीन असतो. प्रकृती नियमाप्रमाणे तो जगतो, वागतो. त्याचे सर्वाधिक परिश्रम कुठे होत असतील तर एखादी गोष्ट मनासारखी घडवून आणणे, एखादी गोष्ट मिळवणे. थोडक्यात, मला यातून काय मिळणार आहे हे तो प्रत्येकात शोधत असतो. हे प्राकृतिक आहे. 


काही ठिकाणी या प्रकृतीवर विकृतीचा विजय झालेला दिसतो, जिथे येन केन प्रकारेण सर्व मलाच कसे मिळेल याची धडपड दिसते. मला नाही मिळाले तर इतर कुणालाही मिळून देणार नाही, प्रसंगी त्याला खाली खेचून, पाडून आपण पुढे जाणे या खलनायकाच्या रुपात ही विकृती आपल्याला समाजात दिसते. 


बहुतांश वेळा या विकृतीवर शेवटी संस्कृतीचा विजय झालेला दिसतो. असे सुसंस्कारित लोक स्वतःपुरता विचार न करता वसुधैव कुटुंबकम् हे ध्येय निश्चित करून समाजकल्याण करताना दिसतात.  देव, देश व धर्म यासाठी ते जीवनार्पण करता व असे करत असताना त्यांच्या जीवनात एकच ध्यास असतो -  "देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखें." 


निसर्ग कायम आपल्याला मुक्तहस्ते द्यायला शिकवत आलेला आहे व यातूनच आपली परोपकारी भारतीय संस्कृती उदयास आली आहे. 


परोपकाराय फलन्ति वृक्षाः परोपकाराय वहन्ति नद्यः। परोपकाराय दुहन्ति गावः परोपकारार्थ मिदं शरीरम् ॥ 


वृक्ष फळ देतात ते दुसऱ्यासाठी, नदी पाणी देते ते दुसऱ्यासाठी, गाय दूध देते ते दुसऱ्यासाठी, अगदी तसेच आपले शरीरसुद्दा परोपकारी खर्ची लागले पाहिजे हेच हा श्लोक सांगतो.  


सूरज हमें रौशनी देता, हवा नया जीवन देती है । 

भूख मिटने को हम सबकी, धरती पर होती खेती है ।

औरों का भी हित हो जिसमें, हम ऐसा कुछ करना सीखें ।।

गरमी की तपती दुपहर में, पेड़ सदा देते हैं छाया ।

सुमन सुगंध सदा देते हैं, हम सबको फूलों की माला ।

त्यागी तरुओं के जीवन से, हम परहित कुछ करना सीखें ॥ 


निसर्गातील सर्वच गोष्टी आपल्याला दुसऱ्यासाठी जगायला शिकवतात. यात एक महत्वाचा मुद्दा लपला आहे. आपण ज्यावेळी दुसऱ्यासाठी निःस्वार्थपणे काही करत असतो, त्याच वेळी कुठेतरी कुणीतरी आपल्यासाठीसुद्धा नक्की काहीतरी करत असतोच.

म्हणूनच सतत मी,माझे,मला आणि फक्त मलाच,  हे न करता आपली जाणिवेची सीमा वाढवून समाजाचे देणे जाणून घेतले पाहिजे. 


जो अनपढ़ हैं उन्हें पढ़ाएँ , जो चुप हैं उनको वाणी दें ।

पिछड़ गए जो उन्हें बढ़ाएँ, समरसता का भाव जगा दें ।

हम मेहनत के दीप जलाकर, नया उजाला करना सीखें ॥ 


हे जेंव्हा आपल्याला जाणीवेतून लक्षात येईल तो सुदिन असेल. 

आपली भारतीय संस्कृती या गोष्टीवरच आधारित आहे व म्हणूनच आजवर इतकी आक्रमणे होऊनही ती टिकून आहे तग धरून आहे. 

चलातर मग, आपल्या उर्वरित आयुष्यातले क्षण 'प्रकृतीनियम' पाळून जगताना थोडे 'संस्कृतीनियम' पाळून जगूया. देते होऊया.