माणूस, अधीरता आणि आत्महत्या .....
आपण हे नेहमी ऐकतो की हल्लीचा जमाना फास्ट फूड चा आलाय. अगदी खरे आहे. पण फास्ट हे फक्त फूड पुरतंच मर्यादित राहिलेलं नाहीये तर आपण केलेल्या कामाचा दृश्य आणि आपल्याला हवा तसा परिणामसुद्धा हल्ली लगेच दिसायला हवा असतो आणि तो जर तसा नाही दिसला तर मनस्थिती व पर्यायाने परिस्थिती इतकी बिघडते की माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो. अगदी स्वतःचं अमूल्य जीवन संपवण्यापर्यंत. इतकी टोकाची भूमिका घेण्याआधी त्याची मनस्थिती नक्की कशी असते, तो असे काही करेल अशी काही लक्षणं दिसतात का अथवा तो हे प्रश्न कुणापाशी, कधी आणि कसे व्यक्त करतो हे एक गूढच आहे..
माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे. त्याला समाज जीवन हवे असते. आपले आपल्या समाजात एक स्थान असावे असे प्रत्येकाला वाटते आणि त्याप्रमाणे प्रत्येकजण प्रामाणिक प्रयत्नही करत असतो. पण कधी कधी समाजात आपली जागा मिळवण्याच्या नादात तो स्वतःचं अस्तित्वच पणाला लावायला निघतो आणि त्यातून हे असे आत्महत्येसारखे दुर्धर प्रसंग ओढवतात. बऱ्याच वेळेला भविष्याची गरजेपेक्षा जास्त केलेली चिंता त्याला वर्तमानात नीट जगू देत नाही आणि मग विचाराच्या वाळवंटात भटकलेला असा तो जीवन संपवण्याचा पर्याय निवडतो. कधी कुटुंबाने त्याच्याकडून अथवा त्याने कुटुंबाकडून ठेवलेल्या अवास्तव अपेक्षा तर कधी दबाव. कधी अन्याय तर कधी अत्याचार. एक ना अनेक कारणे आहेत अश्या गोष्टीला. ह्या चक्रव्युहातुन बाहेर पडण्याचा मार्ग शोधताना दमलेला तो अगदी अगतिक व अधीर होतो आणि त्याला असे वाटू लागते की येणारा प्रत्येक दिवस हा आजच्यापेक्षा वाईटच असेल. असा निराश व हतबल झालेला माणूस लढून जगण्यापेक्षा हार मानून मेलेलं जास्त चांगलं आहे असा गैरसमज करून घेतो आणि जे व्हायला नको असतं तेच होतं.
आपण जेंव्हा स्वतःला स्वतःच्याच कोषात गुरफटून घेतो त्यावेळी आपले प्रश्न आपल्याला खूप मोठे, अवघड आणि असाध्य वाटू लागतात. आणि अश्या वेळी दुर्दैवाने योग्य मार्गदर्शन अथवा मन मोकळे करण्यासाठी एक खांदा मिळाला नाही तर खचून जाणे ठरलेलेच असते. अशी वेळ कधीही आणि कोणावरही येऊ शकते. अश्या कठीण समयाला जो स्वतःला सावरतो तोच खरा 'रणधीर' (रण - युद्ध + धीर - गाजवणारा, धैर्यवान) मानला जातो आणि बाकीचे मात्र 'रणछोड' (रण - युद्ध + छोड - सोडून पळणारा) ठरतात.
१९७७ साली अनुरोध नावाचा एक हिंदी चित्रपट आला होता. त्यातील एक गाणे मला ह्या प्रसंगी आठवते.
तुम बेसहारा हो तो किसीका सहारा बनो, तुमको अपने आप ही सहारा मिल जायेगा
कश्ती कोई डूबती पहुँचा दो किनारे पे, तुम को अपने आप ही किनारा मिल जायेगा
स्वतः दुःखात असताना आपलंच दुःख कुरवाळत न बसता जरा जगाकडे उघड्या नजरेनं बघितलं की लगेच जाणवतं की आपलं दुःख काहीच नाहीये. जगात आपल्यापेक्षा दुःखी हजारो लाखो लोक आहेत पण तरीही ते अश्या प्रसंगांना तोंड देत जीवनाची ही लढाई लढत आहेत. अश्या लोकांना जर आपण जवळ केलं तर आपल्या दुःखाचा डोंगर हलका होतोच शिवाय आपल्याला लढायला एक साथी आणि दैवी बळही मिळतं.
गीतकार पुढे म्हणतो ---
हँस कर ज़िन्दा रहना पड़ता है, अपना दुःख खुद सहना पड़ता है
रस्ता चाहे कितना लम्बा हो, दरिया को तो बहना पड़ता है
तुम हो एक अकेले तो रुक मत जाओ चल निकलो, रस्ते में कोई साथी तुम्हारा मिल जायेगा
जीवन तो एक जैसा होता है, कोई हँसता कोई रोता है
सब्र से जीना आसाँ होता है, फ़िक़्रसे जीना मुश्किल होता है
थोड़े फूल हैं काँटे हैं जो तक़दीर ने बाँटे हैं, हम को इन में से हिस्सा हमारा मिल जायेगा
न बस्ती में न वीरानों में, न खेतों में न खलिहानों में
न मिलता है प्यार बज़ारों में, न बिकता है चैन दुकानों में
ढूँढ रहे हो तुम जिस को, उस को बाहर मत ढूँढो, मन के अन्दर ढूँढो प्रीतम प्यारा मिल जायेगा
नदी जशी वाटेत येणाऱ्या सर्व अडथळ्यांना दूर करत सतत पुढे वाहात असते अगदी तसच आपल्याला सुद्धा सतत आणि कुठेही न थांबता हा जीवनाचा मार्ग चालायचा असतो. सत्याच्या मार्गातील अडथळे साम दाम दंड अथवा भेद याचा वापर करून दूर करणे हेच खरे जीवन आहे. ह्याचसाठी धीर आणि संयम हे गुण आपल्या अंगी बिंबवणे खूप गरजेचे आहे. सूर्योदय झाला आणि उजेड पडला असला तरी पुन्हा अंधार आणि रात्र होणारच आहे. आणि रात्र झाली व काळोख पडला तरी पुन्हा नव्याने दिवस उगवणारच आहे हाच विश्वास मनात बाळगणे खूप गरजेचे आहे. सुख दुःखाला समान मनस्थितीने सामोरे जायची मनाची ही अवस्था आपणच निर्माण करायची असते. म्हणून गीतकार म्हणून जातो की मनाच्या आत डोकावून पहा... आपला आधार आणि आपला धीर मनातच घर करून बसलेला आहे. त्याला शोधा. तो नक्की सापडेल. आणि त्याचा वेध घेतला की हे जगणं कठीण जरी असलं तरी असाध्य होत नाही व दुर्धरही बनत नाही.
स्वतःसाठी जगता जगता थोडं दुसऱ्यासाठी जगून बघितलं की आपल्याला जाणीव होते की हे आयुष्य किती अमूल्य आहे. मग हा अमूल्य ठेवा अशा क्षणिक नैराश्यापायी खर्ची घालायचा मूर्खपणा आपण करणार नाही.
आपल्या मनाला योग्य रस्ता आपली प्रज्ञाच दाखवू शकते. तेंव्हा जागते राहा आणि सावध राहा.
शेवटी इतकेच वाटते की व्यक्तीपुरते जीवन न जगता समष्टीसाठी जगा, समाजासाठी जगा. जे आपल्याला मिळाले तसे आपणही काही समाजाला द्या आणि ह्या मानव जन्माचे सार्थक करा.
जीवने यावदादानं, स्यात प्रदानं ततोधिकं !
No comments:
Post a Comment