Monday, 30 May 2022

ऊर्जावान बना!

 ऊर्जा, जीवन दायिनी आहे. जीवनाची सुरुवात, मध्य व अंत म्हणजे ऊर्जा.

जिथे ऊर्जा तिथे जीवन व जिथे जीवन तिथे ऊर्जा.
ऊर्जेचा अभाव म्हणजे अंधार, ऊर्जेचा अभाव म्हणजे मृत्यू, ऊर्जेचा अभाव म्हणजे निराशा.
समस्त ब्रह्मांड सक्रिय आहे ते ऊर्जेमुळे. आपल्या गतीविधी होतात त्या ऊर्जेमुळे.
ऊर्जेचा सुयोग्य वापर माणसाला सामर्थ्यवान बनवतो तर अयोग्य वापर विनाशकारी.
शरीरातील ऊर्जा योग्य वेळी योग्य तऱ्हेने वापरली तर परिणाम आश्चर्यकारक असतात. पण तीच ऊर्जा जर नको तिथे व नको तितकी वापरली तर मात्र शरीराचे अपरिमित नुकसान होते.
विश्वातही ऊर्जा केंद्रे आहेत, ज्याचा शोध लावून तिथे देवालये निर्माण केली गेली होती. ही देवालये केवळ त्यात स्थापित मूर्तीला बघून तिच्या कोरीव कामाचे कौतुक करण्यासाठी नव्हती. ती होती वैश्विक ऊर्जेला आपल्यात सामावून घेण्यासाठी. देवालयात जाऊन तेथील स्थापित देवतेला आवाहन करून आपले शरीर त्या वैश्विक उर्जाकेंद्रातील ऊर्जेला स्वीकारण्यासाठी सक्षम बनवण्याची प्रार्थना करून ती ऊर्जा ग्रहण करावी हा मंदिरांचा मुख्य हेतू होता. म्हणूनच प्राचीन मंदिरात मनोभावे दर्शन घेऊन बाहेर पडले की आपल्याला ऊर्जावान वाटते.
ऊर्जा हेच जीवन आहे. शरीर जिवंत आहे कारण त्यात ऊर्जा आहे. ऊर्जा संपली की शरीर थंड पडते. असे शरीर कुजायला सुरुवात होते. म्हणूनच ती प्रक्रिया सुरू व्हायच्या आधी ते थंड शरीर अग्निरूपी ऊर्जेत अर्पण करून टाकतात.
ऊर्जा वाणीतून समाधानाने बाहेर पडली तर तिचा आशीर्वाद होतो पण त्याच वेळी ती जर उद्वेगाने, निराशेने, क्रोधाने बाहेर पडली तर तिचा शाप होतो.
म्हणून ऊर्जेचा वापर तारक अथवा मारक असा दोन्ही प्रकारे करता येतो, जशी, अणुऊर्जा तारते आणि मारते देखील.
साऱ्या विश्वात असलेली निर्मिती ही ऊर्जेचे बिंदू आहेत. जे ऊर्जेचे बिंदू आपल्या ऊर्जेचा सुयोग्य वापर करतात ते आपले जीवन प्रकाशमान करून सोडतात, इतके प्रकाशमान की त्यांच्या देहाच्या जाण्यानंतरही तो प्रकाश कायम असतो. तो प्रकाश इतरांना ऊर्जा देतो.
नकारात्मक ऊर्जा माणसाचे अध:पतन घडवून आणते.
म्हणून आपली ऊर्जा सतत सकारात्मक असावी.
ऊर्जा सकारात्मक राखण्यासाठी विश्वशांती प्रार्थना, मंत्राभ्यास, ध्यान, प्राणायाम, योग, सूर्यनमस्कार, विपश्यना, उपासना याचा प्रचंड उपयोग होतो.
जो यापैकी काहीही करत असतो त्याला ही सकारात्मकता जाणवतेच. इतकेच नाही तर कालांतराने समोरच्या व्यक्तीतून बाहेर पडणारी ऊर्जा ही सकारात्मक आहे का नकारात्मक हे सुद्धा जाणवू लागते.
हे जाणवले की माणूस अश्या नकारात्मक ऊर्जेपासून स्वतःला दूर ठेवतोच.
आपल्या शरीरातील ऊर्जेच्या लहरी जाणवायला सुरुवात झाली की ज्या वेळी आपण मंदिरात जाऊ त्यावेळी त्या ऊर्जाकेंद्रावर स्थापित विग्रहातून (मूर्तीतून) बाहेर पडणारी प्रचंड सकारात्मक ऊर्जा आपल्याला जाणवते. त्या लहरी जेंव्हा आपल्या शरीरास येऊन स्पर्श करतात तेंव्हा आपले शरीर थरथरते. मनातील विचार काही सेकंदासाठी शून्य होतात व शरीर मनाची अतिशय आनंददायी अवस्था प्राप्त होते. ही जाणीव अतिशय आनंद देणारी असते.
ऊर्जावान बना!

No comments:

Post a Comment