Monday, 30 May 2022

देवभक्ती व अध्यात्म खरंच देशोधडीला लावते?

 *****देवभक्ती व अध्यात्म खरंच देशोधडीला लावते?**** 


महाभागवत संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज म्हणतात - 

बरे झाले देवा निघाले दिवाळे । बरी या दुष्काळे पीडा केली ॥

अनुतापे तुझे राहिले चिंतन । जाला हा वमन संवसार ॥

बरे झाले देवा बाईल कर्कशा । बरी ही दुर्दशा जनामध्ये ॥

बरे झाले जगी पावलो अपमान । बरे गेले धन ढोरे गुरे ॥

बरे झाले नाही धरिली लोकलाज । बरा आलो तुज शरण देवा ॥

बरे झाले तुझे केले देवाईल । लेकरे बाईल उपेक्षिली ॥

तुका म्हणे बरे व्रत एकादशी । केले उपवासी जागरण ॥ 


याचा अध्यात्मिक गूढार्थ वेगळा आहे हे मान्य, पण लौकिक जीवनातसुद्धा हे श्लोक अगदी चपखल बसतात. ज्यांना हा अनुभव आला आहे त्यांना हे नक्कीच जाणवेल व कळेल की अध्यात्मात दिवाळे का निघते! 

परमेश्वरावर प्रेम करणे हा कधीच side business म्हणून करायची गोष्ट नाहीये. जो साऱ्या ब्रह्मांडाचा निर्माता, रक्षिता व संहारिता आहे त्याच्याशी आपली अलौकिक गाठ बांधायची म्हणजे सोपी गोष्ट नाही. 

ते तेज, ती ऊर्जा आपल्या नश्वर देहात येणे, ती झेपणे व ती बाळगणे हे येऱ्या गबाळ्याचे काम मुळीच नाहीये. 

जसे एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत तसेच मन संसारात गुंतवून, त्यात अडकून परमेश्वर प्रीती साध्य होत नाही. संसार हा केवळ आदेश म्हणून जेंव्हा केला जातो व ईश प्रेम जेंव्हा निरपेक्षपणे केले जाते तेंव्हाच ते त्या परमात्म्यापर्यंत पोहोचते. 

हे करत असताना परमेश्वर त्याच्याच योगमायेत आपल्याला अनेक प्रकारे अनेक वेळा अडकवून ठेवतो, गुंतवून ठेवतो. इतके की आपल्याला कळतही नाही की हे जे आपल्याला आनंददायी वाटते आहे ते सुद्धा मायेचेच रूप आहे व हे देखील ईशप्राप्तीत अडसर होऊ शकते. ही जाणीव जेंव्हा आपल्या विवेकाला पटते त्यावेळी परमेश्वर एक एक पाश तोडायला सुरुवात करतो. 

ही प्रक्रिया लौकिक अर्थाने अत्यंत कष्टदायक असते. कधी तुमचा मान सन्मान दुरावतो, कधी पैसे, कधी इज्जत तर कधी एखादी अत्यंत प्रिय व्यक्ती, वस्तू. 

ज्याप्रमाणे ज्वारीच्या लाह्या बनतात त्याप्रमाणे गरम तप्त वाळूत आपण सर्व बाजूने भरडले व घोळले जातो. 

त्यात जे ईश कृपेने तरतात ते जशी ज्वारी आतून फुटून उमलून बाहेर येते व लाही तयार होते तसे उमलले जातात. 

जोवर लौकिकाचा मोह मनापासून सुटत नाही तोवर हीच प्रक्रिया पुन्हा पुन्हा सुरूच राहते. यातून जे बोध घेतात ते एक पायरी पुढे सरतात. 

जोवर लौकिकाचे दिवाळे निघत नाही तोवर अलौकिकाची दिवाळी साजरी होऊच शकत नाही. 

जे गेले ते त्याच्या इच्छेने, जे राहिले ते ही त्याच्या इच्छेने ही भावना वाढीस लागणे गरजेचे असते. 

परमेशची इच्छा हीच आपली इच्छा मानून अखंड नामात बुडून आदेशाचा संसार केला की निघणाऱ्या दिवाळ्याचासुद्धा एक उत्सव होतो. 

अश्या उत्सवात रंगलेले तुकोबा वर उल्लेखलेल्या ओळी लिहू शकले व तद्वत रमू शकले. 

मग देशोधडीला नक्की काय लागते? आपल्या वासना, अमर्याद गरजा, लोभ, मोह, माया, ममता यांच्या राज्यात आपण सुखे नांदत असताना जेंव्हा परमेश्वराचे पाऊल आपल्या हृदयी विराजते त्यावेळी या गरजा, वासना, माया, ममता आपल्याला सोडून जाऊ लागतात. इतकी युगे आपण त्यांच्यासोबतच रमलो असल्याने त्या सोडून जाताना आपले लौकिक जीवनात हाल हाल होतात, पण त्याच वेळी अलौकिकाचा मळा फुलायला सुरुवात झालेली असते. नामस्मरणाचे अखंड तीर्थ या मळ्यात देत राहिले की असे लौकिक दिवाळे सुसह्य होते. 

एकीकडे आपण देशोधडीला लागतो तर दुसरीकडे तोच परमेश्वर आपल्याला नित्यशाश्वताची सत्ता सुपूर्त करत असतो.

त्यामुळे ज्यांना श्रीचरणकमल सदास्वरूपी हवे असतील त्यांनी अश्या दिवाळखोरीला कायम तयार असावे. 

                ||कर्ता एक रघुनंदन||

No comments:

Post a Comment