Sunday, 5 September 2021

डॉ राधाकृष्णन जीवनी

 जाणून घेऊ ... डॉ राधाकृष्णन जीवनी (शिक्षक दिन) 


डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म  5 सप्टेंबर 1888 रोजी तत्कालीन मद्रास प्रांतात चित्तूर जिल्ह्यात तिरुत्तनी गावात झाला. हिंदूधर्मसंस्कारात वाढलेल्या राधाकृष्णन यांचा वेद, उपनिषद, पुराणे, धर्मतत्व याचा प्रचंड अभ्यास होता. त्यांच्या अनेक लेखातून त्यांनी आपली धर्मविषयी मते समाजापुढे ठेवली. संस्कृत, हिंदी, तेलगू, तामिळ, इंग्लिश आदी अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. स्वामी विवेकानंद यांना ते आदर्श मानत. 

ख्रिश्चन मिशनरी शाळा व कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांना हे जाणवले की यातून हिंदू धर्माची अवहेलना होत आहे व आपल्या संस्कृतीला दूषणे देऊन धर्मप्रसाराला जोर दिला जात आहे. याला त्यांनी कडाडून विरोध केला. स्वतःचा धार्मिक अभ्यास वाढवून तर्कातून त्यांनी मिशनरीना सडेतोड उत्तरे दिली. त्यांनी धर्मवेदांत फिलॉसॉफी विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले व देशविदेशातील अनेक नामांकित जर्नलमध्ये आपले थेसिस लिहिले. वयाच्या 21व्या वर्षी सन 1909 ला त्यांनी कॉलेजमध्ये शिकवण्यास सुरुवात केली. 1962 पर्यंत ते देशातील व परदेशातील अनेक नामांकित कॉलेजात प्राध्यापक, विश्वविद्यालयात कुलगुरू व ऑक्सफर्ड विद्यापीठासारख्या जागतिक दर्जाच्या विद्यापीठात  प्राध्यापक (असे मानाचे पद मिळवणारे पाहिले भारतीय) म्हणून कार्यरत होते. अख्या जगास त्यांनी आपल्या बुद्धीवर्चस्वाने मंत्रमुग्ध करून ठेवले होते. जागतिक दर्जाच्या शेकडो विद्यापीठातून त्यांना लेक्चरसाठी व विविध पदे भूषावण्यासाठी बोलावणे येई. जवळपास 100 पेक्षा जास्त जागतिक विद्यापीठांकडून त्यांना सन्माननीय उच्च पदवी व मेरिट बहाल करण्यात आल्या होत्या. हे एकमेव असे व्यक्तिमत्व होते ज्यांचा जगाने इतका सन्मान केला असेल. 

ब्रिटिशांनी शिक्षणक्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी त्यांना सर या पदवीने भूषित केले होते, जी त्यांनी स्वातंत्र्यानंतर वापरणे सोडून दिले व डॉ. ही आपली शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदानामुळे मिळवलेली पदवी लावणे योग्य मानले. 

त्याचवेळी राजकीय क्षेत्रात न येता सुद्धा त्यांचे तिथे बुद्धीवर्चस्व होते व म्हणूनच 14 ऑगस्ट 1947 रोजी रात्री स्वातंत्र्यदिनाला त्यांनी देशाला संबोधित करावे ही तात्कालीन संविधान सभेची इच्छा होती. त्यांनी तसे केले व अत्यंत उत्कृष्टपणे देशास संबोधित केले. 

13 मे 1952 रोजी त्यांची देशाचे उपराष्ट्रपती म्हणून नियुक्ती झाली. ते या पदावर 14 मे 1957 पर्यंत होते. 

देशाचे प्रथम राष्ट्रपती डॉ राजेंद्रप्रसाद यांनी त्यांना 1954 रोजी भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित केले.

 यानंतर 13 मे 1962 रोजी ते भारताचे दुसरे राष्ट्रपती नियुक्त केले गेले. या पदावर ते 13 मे 1967 पर्यंत राहिले. 

हे सर्व कार्य करीत असताना त्यांनी ज्ञानदान अखंड सुरूच ठेवले होते व त्यांच्यातील हाडाचा शिक्षक त्यांना कधीच गप्प बसू देत नव्हता. आयुष्याची अंदाजे 40+ वर्षे त्यांनी अविरत ज्ञानदान केले. 

राष्ट्रपती असताना, त्यांचे काही विद्यार्थी व मित्र 5 सप्टेंबर 1962 रोजी त्यांना भेटायला व त्यांचा वाढदिवस साजरा करायला त्यांच्या कार्यालयात गेले असता डॉ राधाकृष्णन यांनी अश्या प्रकारे मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा करायला साफ नकार दिला. तेंव्हा ते म्हणाले की तुम्हाला आजच्या दिवशी काही करायचेच असेल तर ते देशातील शिक्षकांसाठी करा. त्यांच्या या इच्छेखातर देशात त्यावर्षीपासून त्यांचा जन्मदिवस हा शिक्षकदिन म्हणून साजरा होऊ लागला. 

No comments:

Post a Comment